“पीएम श्री” या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यास मान्यता प्रदान करणेबाबत PM shri Schools for Rising India

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“पीएम श्री” या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यास मान्यता प्रदान करणेबाबत PM shri Schools for Rising India

प्रस्तावना:-

“पीएम श्री” (PM Schools for Rising India) या योजनेअंतर्गत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील सर्व घटकांचा समावेश करण्याच्या उद्देशाने देशातील सुमारे १५,००० हून अधिक शाळा उत्कृष्ट भौतिक/पायाभूत सुविधांसह, योग्य संसाधनासह, आनंददायी व उत्साहवर्धक शैक्षणिक दृष्ट्या अनुकूल शालेय वातावरणात उच्च दर्जाचे गुणात्मक शिक्षण देणाऱ्या सर्वसमावेशक उत्कृष्ट शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. तसेच, पुढील टप्यात २,५०,००० शाळा उत्कृष्ट केल्या जाणार असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधील विविध तरतुदींची अंमलबजावणी या शाळांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या शाळांचे उद्दिष्ट फक्त आकलनात्मक विकास (cognitive development) करण्यापुरते मर्यादित नसून, मुलांचा २१ व्या शतकातील प्रमुख कौशल्यांवर आधारीत सर्वांगीण विकास करणे व त्यांना सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्व घडवणे हे देखील आहे. प्रत्येक इयत्तेत प्रत्येक मुलाच्या अध्ययन निष्पतीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

२. “पीएम श्री” शाळा खालील उद्दिष्टांची पुर्तता करतील:-

अ) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० नुसार एक समान, सर्वसमावेशक, समाजोपयोगी आणि समाजाप्रती योगदान देणारे नागरिक घडविणे.

आ) अनुभवात्मक, समग्र, एकात्मिक, खेळाधारित (विशेषतः पायाभूत वर्षातील शिक्षण), चिकित्सक, शोध आधारित, विद्यार्थी केंद्रित, चर्चाआधारित, लवचिक आणि

आनंददायक शिक्षणपद्धतीचा अवलंब करून विद्यार्थ्यांना अनुभवात्मक पद्धतीने आनंददायी शिक्षण देणे.

इ) प्रत्येक इयत्तेत प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करून त्याच्या तार्किक कौशल्यांचे मूल्यांकन करणे, विद्यार्थ्यांची वैचारिक समज आणि वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये ज्ञानाच्या वापरावर आणि योग्यतेवर आधारित मुल्यांकन करणे, व्यावसायिक शिक्षणासाठी कौशल्य आधारित अभियोग्यता चाचणी घेणे.

ई) समाज आणि माजी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेऊन त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, अतिरिक्त पूरक मार्गदर्शन व शैक्षणिक मदत करणे.

उ) सर्व मुलांना शाळेत दाखल करून त्यांची नियमित उपस्थिती टिकवून ठेवून त्यांच्या शिकण्याच्या प्रगतीचे मुल्यांकन करणे. काही कारणास्तव त्यांची गळती झाली असल्यास त्यांना पुन्हा प्रवेश देऊन, अशी मुले शिक्षणात मागे पडली असल्यास त्यांना अतिरिक्त पूरक मार्गदर्शन देणे.

ऊ) शिक्षणात अग्रेसर म्हणून कामगिरी पार पाडून कालांतराने शेजारच्या शाळांना आपले अनुकरण करण्यासाठी मार्गदर्शन करणे,

ऋ) शाळा, “औद्योगिक क्रांती ४.०” नुसार (Industrial Revolution ४.०.) उदयोन्मुख अर्थव्यवस्थेच्या (emerging economy) आवश्यकतांनुसार पूरक करणे.

३. “पीएम श्री” शाळा खालील प्रमुख सहा आधार स्तंभाच्या आधारे विकसित करण्यात येतील

१) अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यमापनः-

“पीएम श्री” शाळांमधील अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापनांचा उद्देश विद्यार्थ्यांना संस्था आणि उद्देशाची भावना यासह स्मरणशक्तीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतत्चे जीवन घडविण्यासह इतरांच्या जीवनात योगदान देण्यासाठी आवश्यक असलेल्या क्षमतांनी सुसज्ज करणे हा आहे. सदर शाळांमध्ये शिकवणे आणि शिकणे अधिक परस्परसंवादीपणे होईल आणि वर्गातील सत्रे अधिक मनोरंजक, सर्जनशील, सहयोगी आणि अन्वेषणात्मक असतील याची खात्री करण्यात येईल.

२) प्रवेश आणि पायाभूत सुविधाः-

“पीएम श्री” शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला एक जबाबदार व्यक्ती म्हणून विकसित होण्यासाठी, जास्तीत जास्त ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी आवश्यक शिकण्याचे वातावरण प्रदान करतील. सर्व लिंगांच्या तसेच दिव्यांग मुलांसह शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित, सर्वसमावेशक आणि परिणामकारक शैक्षणिक वातावरण प्रदान होईल व ते शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी आरामदायक आणि प्रेरित असल्याची खात्री करतील

याअंतर्गत अस्तित्वात असलेल्या शाळांचा विस्तार करण्यात येईल तर अशा शाळा अस्तित्वात नसलेल्या भागात अतिरिक्त दर्जेदार शाळा बांधून विशेषतः मुलींसाठी सुरक्षित आणि व्यावहारिक वाहतूक व्यवस्थेसह, वसतिगृह जेणेकरुन सर्व मुलांना अशा योग्य स्तराच्या दर्जेदार शाळांमध्ये जाण्याची संधी मिळेल.

३) मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व:-

शिक्षणातील झपाट्याने होत असलेली प्रगती पाहता, अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र तसेच मुल्यमापन इत्यादींच्या नवीनतम पद्धतीनुसार शिक्षकांना प्रशिक्षित करणे महत्त्वाचे आहे. शिक्षक हे शैक्षणिक परिसंस्थेतील महत्त्वाचे सहाय्यक देखील आहेत. शिक्षण व्यवस्थेतील गतिमानतेसाठी शिक्षकांनी आजीवन शिकत राहून प्रशिक्षण आणि उच्च कौशल्याच्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. शालेय नेतृत्व विकास हा शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.

“पीएम श्री” शाळा शिक्षकांना त्यांच्या कार्यकाळात प्रत्यक्षरीत्या तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या बाबतीत्त आवश्यक समर्थन प्रदान करण्यासाठी सक्षम करतील.

४) समावेशक पद्धती आणि लिंग समानताः-

शारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या सुरक्षित वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या भावनिक कार्यक्षेत्रावर प्रभाव टाकणा-या प्रेरणा, दृष्टीकोन आणि धारणा इ. मूल्यावर परिणाम होत असल्याने, असे वातावरण असलेल्या “पीएम श्री” शाळांमध्ये सर्व विद्याथ्यर्थ्यांना प्रवेश मिळणे आवश्यक आहे. त्यानूसार “पीएम श्री” शाळा सर्वसमावेशक पद्धती आणि लिंग समानतेमध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्याचे सुनिश्चित करतील.

५) व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन:-

“पीएम श्री” शाळांनी शालेय परिवर्तनाचा परिणाम तपासण्यासाठी एक मजबूत व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन प्रणाली सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यामध्ये “पीएम श्री” शाळांमध्ये विद्यमान योजना, नियोजन यंत्रणा, संसाधन व्यवस्थापन आणि इतर व्यवस्थापकीय पैलूंसह निरीक्षण आणि मूल्यमापन यंत्रणा यांचा समावेश आहे. त्यानुसार “पीएम श्री” शाळा पुरेशी व संबंधित व्यवस्थापन, देखरेख आणि प्रशासन यंत्रणा कार्यरत असल्याची खात्री करतील.

६) लाभार्थी समाधान:-

शिक्षण प्रणालीमध्ये असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समुदाय इ. विविध भागधारकांच्या भूमिका आणि परिणामकारकता विचारात घेऊन “पीएम श्री” शाळांमधील गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येईल. वरील नमूद भागधारकांनी हाती घेतलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांचे एकत्रीकरण शाळेच्या परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावेल.

“पीएम श्री” (PM Schools for Rising India) या योजनेची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यास मा. मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून, यासंदर्भातील औपचारीक आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

१. “पीएम श्री” या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्याने केंद्र शासनासोबत सामंजस्य करार केला असून, त्यानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० राज्यात संपूर्णपणे लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. राज्यात “पीएम श्री” ही केंद्र पुरस्कृत योजना केंद्र राज्य निधी हिस्सा अनुक्रमे ६० : ४० प्रमाणे सन २०२२-२३ पासून राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

३. त्यानूसार सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य हिश्याकरिता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यत्ता देण्यात येत आहे.

४. पहिल्या टप्यात राज्यातील प्रत्येक गटातून कमाल २ शाळा याप्रमाणे ८४६ शाळा विकसीत करावयाच्या असून, पहिल्या टप्यासाठी प्रती शाळा रु. १.८८ कोटी तरतूद विचारात घेता, केंद्र हिस्सा ६० टक्के प्रमाणे रु. १.१३ कोटी नूसार ८४६ शाळांसाठी ५ वर्षाकरीता केंद्र हिस्सा रु. ९५५.९८ कोटी राहणार आहे. तर राज्याचा ४० टक्के हिस्सा प्रमाणे रु. ७५ लाख प्रती शाळा नूसार ५ वर्षाकरीता अंदाजे रु. ६३४.५० कोटी खर्च अपेक्षित आहे. यास्तव सदर योजनेसाठी प्रतिवर्षी केंद्र हिस्सा अंदाजे रु. १९१.२० कोटी व राज्य हिस्सा अंदाजे रु. १२६.९ कोटी तरतूद ५ वर्षाकरिता अर्थसंकल्पीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

५. योजनेचे लेखाशीर्ष मंजूर होऊन निधी अर्थसंकल्पीत होण्यासाठी कालावधी लागणार असल्याने सन २०२२-२०२३ या वर्षातील “पीएम श्री” योजनेचा खर्च विभागाच्या समग्र शिक्षा योजनेच्या अर्थसंकल्पीत तरतूदीतून करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

६. “पीएम श्री” या योजने अंतर्गत दुसऱ्या टप्यात ४०८ गट, २८ महानगरपालिका व ३८३ नगरपालिका/नगरपरिषद यामधून “पीएम श्री शाळांची निवड केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचना निर्गमीत केल्यानंतर करण्यात येईल. सदर शाळांसाठी पुढील कार्यवाही शालेय शिक्षण विभाग स्तरावर करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

७. पीएम श्री या योजनेची अंमलबजावणी समग्र शिक्षा यंत्रणेमार्फत करण्यास मान्यता

देण्यात येत आहे.

२. योजनेची अंमलबजावणीः-

“पीएम श्री” या योजनेची अंमलबजावणी राज्य स्तरावर समग्र शिक्षा या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राज्य अंमलबजावणी संस्थेमार्फत (State Implementation Society) अर्थात विभागाद्वारे महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जिल्हा स्तरावर या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबधित मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका स्तरावर संबधित आयुक्त महानगरपालिका यांची राहणार आहे. त्याची रचना पुढीलप्रमाणे असेल:-

या योजनेंतर्गत निवड होणाऱ्या शाळांच्या नावासमोर “पीएम श्री शाळा असे नामाभिधान राहणार असून, विद्या समीक्षा केंद्राद्वारे सदर शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे (Learning Outcomes) मुल्यांकन केले जाईल.

३. सदर शासन निर्णय नियोजन विभाग, अनौ.सं.क्र. ३५३/१४७१/२०२२, दि. ३०/११/२०२२ तसेच वित्त विभाग, अनौ.सं.क्र.१२०२/२०२२/व्यय-५, दि.०५/१२/२०२२ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०२३०३०२१७१०५०३४२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शासन निर्णय येथे पहा

Join Now