शिक्षक भरतीसाठी मोठा निर्णयः कंत्राटी नियुक्त पद्धती रद्द kantrati bharti shasan nirnay cancel
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत डी.एड., बी.एड. अर्हता धारक बेरोजगार उमेदवार यांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करणेबाबतचा शासन निर्णय अधिक्रमित करणेबाबत.
प्रस्तावना:-
संदर्भ क्र. ५ येथील दि.२३.०९.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये संदर्भ क्र.४ येथील शासन निर्णय अधिक्रमित करुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यात १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डि.एड./ बी.एड. अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता प्रदान करण्यात आली होती. वस्तुतः नियमित शिक्षकांच्या नियुक्तीपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यास्तव ही तात्पुरती व्यवस्था करण्यात आली होती. सन २०२२ च्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणांच्या आधारे करण्यात येणाऱ्या शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा दिनांक २०.०१.२०२५ रोजी प्रत्यक्षात सुरु झाला आहे. त्यामुळे आवश्यक अर्हताधारक व पात्र शिक्षक नियमित तत्वावर उपलब्ध होणार आहेत, ही वस्तुस्थिती विचारात घेऊन संदर्भ क्र.४ व संदर्भ क्र. ५ येथील शासन निर्णय अधिक्रमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णयः-
संदर्भ क्र.४ व ५ येथील शासन निर्णय या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहेत.
२. संदर्भ क्र. ४ व ५ येथील शासन निर्णयान्वये ज्या उमेदवारांना त्या शासन निर्णयातील तरतुर्दीच्या आधारे कंत्राटी तत्वावर तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाल संपुष्टात येणे अथवा ते कार्यरत असलेल्या पदावर नियमित शिक्षकाची नियुक्ती होणे यापैकी जे अगोदर घडेल, तितक्या कालावधीपर्यंत अशी नियुक्ती चालू राहील व त्यानंतर त्यांना पुनर्नियुक्ती देता येणार नाही.
३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०२१०१६५२४७३०२१ असा आहे. हा शासन
निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने