राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत शासन निर्णय nipun maharashtra abhiyan 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत शासन निर्णय nipun maharashtra abhiyan 

विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविणेबाबत

वाचा:

१) राष्ट्रीय शिक्षण धोरण- २०२०

२) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२१/प्र.क्र.१७९/एसडी-६, दिनांक २७ ऑक्टोंबर, २०२१

३) शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचेकडील पत्र दि. २०/०८/२०२४ (निपुण भारत उपक्रम सुधारित लक्ष्ये)

प्रस्तावना-

राज्यात शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी वेळोवेळी विविध शैक्षणिक कार्यक्रम लागू करण्यात आले आहेत. संदर्भ क्र. २ अन्वये राज्यात निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान लागू करण्यात आले आहे. संदर्भ क्र. ३ अन्वये निपुण भारत अंतर्गत सुधारित लक्ष्ये देण्यात आलेली आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातील, “प्राथमिक शाळांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही शिक्षणव्यवस्थेची सर्वोच्च प्राथमिकता असेल. ही अगदी प्राथमिक अध्ययन आवश्यकता (म्हणजे, मूलभूत पातळीवरील वाचन, लेखन आणि अंकगणित) आधीच साध्य केली तरच, हे उर्वरित धोरण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल” हे विधान अतिशय महत्त्वाचे आहे.

सबब, सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) प्राप्त करण्यासाठी त्वरित एक अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सदर अभियानात विद्यार्थी, पालक, शाळा, शिक्षक, समाज व शासकीय यंत्रणा या सर्वांनी समन्वयाने पुढाकार घेऊन राज्यातील सर्व विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. तसेच NAS व ASER यांसारख्या राष्ट्रीय व राज्य स्तरावरील विविध सर्वेक्षण अहवालांमध्ये राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत जी स्थिती दर्शविण्यात आलेली आहे त्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी लक्ष्य केंद्रित कामकाज करणे आवश्यक झालेले आहे.

भारत सरकारने निपुण भारत (NIPUN- National Initiative For Proficiency In Reading With Understanding and Numeracy) अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांने इयत्ता २ री पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. यानुषंगाने इयत्ता २ री पेक्षा वरच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केल्या नाहीत, त्यानांही त्या प्राप्त करण्याची उचित संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे म्हणून संदर्भ क्र.२ व ३ ची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

राज्यातील दुसरी ते पाचवी च्या वर्गातील शालेय विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वृध्दींगत करण्याकरिता निपुण महाराष्ट्र अभियान व त्या अंतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

१) निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचे ध्येय-

वर्गातील १०० टक्के विद्यार्थ्यांनी १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु, नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करुन इ. २ री ते ५ वी च्या प्रत्येक वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात येत आहे.

२) कृती कार्यक्रमाची व्याप्ती –

अ) सदरील कृती कार्यक्रम स्वयंअर्थसहायित व विना अनुदानित शाळा व तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इ. २ री ते ५ वी च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. (इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरुपात यात सहभागी होता येईल.)

आ) या विद्यार्थ्यांना प्रथम भाषा व गणित विषयांसाठी या कृती कार्यक्रमासाठी ठरवून देण्यात आलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त होण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

३) या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता

परिशिष्ट १ व ३ मध्ये नमूद करण्यात आल्या आहेत.

४) कृती कार्यक्रम कालावधी-

सदर कृती कार्यक्रम अंमलबजावणी कालावधी दिनांक ५ मार्च, २०२५ ते ३० जून, २०२५ असा राहील. यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात यावी. अशा क्षमता विद्यार्थ्यांना पूर्ण क्षमतेने प्राप्त होण्यासाठी शालेय वेळेमध्येच संबंधित शिक्षकांनी उपाययोजना कराव्यात तसेच, यासाठी शालेय वेळेव्यतिरिक्त वेळ वापरणे आणि सुटीच्या कालावधीचा सदुपयोग करणे आवश्यक असल्यास याविषयी संबंधित शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी त्या त्या वेळी नियोजन करावे. शिक्षकांना आवश्यकतेनुसार सर्व शैक्षणिक सहाय्य (Academic support) मिळेल याचा पूर्ण प्रयत्न मुख्याध्यापकांनी करावा.

५) सुट्यांमधील सराव-

उपक्रमाच्या कालावधीत सुट्टीचा कालावधी आहे. यावेळी अध्ययनात मागे असणाऱ्या तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य केलेल्या मुलांकरिता शिक्षकांनी आपल्या स्तरावरून विविध (ऑनलाईन / ऑफलाईन) मार्गानी संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखले जाईल, चर्चा, मार्गदर्शन होईल असे नियोजन करावे, जेणेकरून अध्ययन केलेल्या बाबींचे विस्मरण होणार नाही व या कृत्ती कार्यक्रमाचे अपेक्षित ध्येय साध्य करता येईल.

६) कृती कार्यक्रम अंमलबजावणीचे सूक्ष्म नियोजन-

अ) शिक्षकांनी या कृती कार्यक्रमासाठी विहित केलेल्या अपेक्षित अध्ययन क्षमता आपल्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केल्या आहेत किंवा कसे यासाठी विद्यार्थ्यांची या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी करावी, (अध्ययन क्षमता पडताळणी स्तराचा नमुना परिशिष्ट २ व ४ मध्ये नमूद आहे.) त्यानुसार अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःवा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आखावा, त्याची नोंद ठेवावी आणि त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी.

आ) या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचे वेळोवेळी स्वतंत्र गट करावे व त्यांचेसाठी नियमित अध्ययन कामकाज सुरु राहील अशी योजना करावी.

इ) प्रत्येक अध्ययन क्षमतेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षमतेनुसार स्वतंत्र गट तयार करावेत. प्रत्येक गटाची गरज ओळखून साधन सामग्री पुरवावी. जसे अध्ययन साधने, वाचन सामग्री, शब्द कार्ड, चित्रे, वस्तू इत्यादी. गटनिहाय अध्ययनाचे वेळापत्रक ठरवावे.

ई) जसजसे विद्यार्थी या कृती कार्यक्रमासाठीच्या अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील तसा प्रगती अहवाल “चावडी वाचन व गणन” कार्यक्रमात सादर करावा, ज्यात या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित प्रगती खात्रीपूर्वक गाठलेल्या विद्यार्थ्यांची प्रगती सर्वांना दर्शवावी.

उ) दिनांक ३० जून, २०२५ पर्यंत आपल्या इ. २ री ते ५ वीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान ७५ टक्के विद्यार्थी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची खात्री प्रत्येक शिक्षकाने करावी.

ऊ) या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इयत्ता २ री ते ५ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकविणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावनिहाय प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकांनी तात्काळ करावी.

७) या कृती कार्यक्रमांतर्गत शिक्षकांनी आपल्या वर्गाचा अपेक्षित अध्ययनस्तर घोषित करणे –

अ) कृती कार्यक्रमाच्या सुरुवातीला वर्गातील सर्व विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी (Mapping) विद्या समिक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून, वरील मुद्दा ६. (ऊ) च्या आदेशान्वये मुख्याध्यापकांद्वारे ऑनलाईन स्वरुपात करण्यात येईल.

आ) दिनांक ०५/०३/२०२५ रोजीच्या पहिल्या अध्ययन क्षमता पडताळणीची नोंद (विद्यार्थी निहाय व या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित स्तरनिहाय अध्ययन क्षमता परिशिष्ट १, २, ३, ४ मध्ये नमूद केलेल्या स्वरुपात) शिक्षकांनी करून ठेवावी आणि नंतर विद्या समिक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ / Bot वर नोंद करावी. दि. ३० जून, २०२५ पर्यंत या कृती कार्यक्रमांतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला आहे त्यांची या विषयांची नोंद झाल्यावर आणखी काही नोंद करण्याची आवश्यकता नाही.

इ) ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांच्या नोंदी पुढील तारखांना वरील संकेतस्थळ / Bot वर कराव्यात. २० मार्च, ०५ एप्रिल, २० एप्रिल, ०५ मे, २० मे, १५ जून आणि ३० जून २०२५ याप्रमाणे वर्ग/ शाळांची आकडेवारी शाळा, केंद्र, बीट, तालुका आणि जिल्हानिहाय सर्वांसाठी जाहीर करण्यात येईल.

ई) कृती कार्यक्रम सुरु झाल्यानंतर दि. ३० जून, २०२५ पर्यंत शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करुन अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता जेंव्हा प्राप्त केल्या असतील त्याचवेळी विद्या समिक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ / Bot वर या कृती कार्यक्रमाचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करावे.

उ) शिक्षकांनी उपरोल्लेखितपणे घोषित करत असताना विद्यार्थ्यांच्या संपादित अध्ययन क्षमता संदर्भात कोणतीही चुकीची माहिती भरली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. मे महिन्यामध्ये सुट्टया मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषित करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. संपादित अध्ययन क्षमतांमध्ये सातत्य राहील या दृष्टीने विद्यार्थ्यांचा वेळोवेळी सराव घेणे याची खात्री शिक्षकांनी करणे आवश्यक आहे.

८) अंतिम मूल्यांकन-

अ) शिक्षकांनी स्वतः या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत त्वरीत भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व शाळेचे कौतुक करण्यात यावे. भेटीचा अहवाल त्याच दिवशी पर्यवेक्षकीय यंत्रणेने विद्या समिक्षा केंद्र (VSK) च्या माध्यमातून देण्यात आलेल्या संकेतस्थळ / Bot वर नोंदवावा, अशा सर्व भेटी दि.१५ जुलै, २०२५ अखेर पूर्ण करण्यात याव्यात.

आ) अनुपस्थित विद्यार्थ्यांचे दुसऱ्या दिवशी अथवा असे विद्यार्थी ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील त्या दिवशी पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत पुन्हा प्रत्यक्ष भेट देऊन कौतुक करण्यात यावे. अशा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत शिक्षक संबंधित पर्यवेक्षकीय यंत्रणेस कळवतील याची खात्री मुख्याध्यापकांनी करावी.

इ) या कृती कार्यक्रमाच्या कालावधी नंतरही केल्या जाणाऱ्या शाळा व वर्ग भेटीमध्ये या मुद्द्यांचा जाणीवपूर्वक विचार करण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता संपादणूक संदर्भात शिक्षकांनी अद्ययावत राहावे.

ई) ज्या वर्गासाठी उपरोक्त प्रमाणे स्वयंघोषणा विद्या समिक्षा केंद्र (VSK) संकेतस्थळ / Bot वर संबंधित शिक्षकांनी केलेली नाही, त्या वर्गावर या कृत्ती कार्यक्रमाव्यतिरिक्त स्थानिक / राज्य पातळीवरील असा कोणताही इतर उपक्रम जो, या कृती कार्यक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या वरच्या स्तराचे लक्ष्य ठेवतो, राबविण्यात येऊ नये.

९) लोकसहभाग व सामाजिक अंकेक्षण (Social Audit)-

अ) सदर कृतीकार्यक्रम कालावधीत दर १५ दिवसांनी गावपातळीवर “चावडी वाचन व गणन” कार्यक्रम राज्यस्तरावरून नेमून दिलेल्या तारखांना आयोजित करण्यात यावा. यात गावातील नागरिक, पालक यांना आमंत्रित करण्यात यावे. शहरी भागामध्ये शाळा व्यवस्थापन समिती

अथवा पालक शिक्षक सभांमध्ये असे “वाचन व गणन कार्यक्रम” आयोजित करावेत. असे कार्यक्रम ३० मार्च २०२५ नंतर आयोजित करण्यात यावेत. एखाद्या वर्गाने अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त केला असेल तर त्यांना अशा कार्यक्रमांचे आयोजन दि.३०.०३.२०२५ आधीही करता येईल, दिनांक ०१ मे, २०२५ रोजीच्या ग्रामसभेमध्येही “चावडी वाचन व गणन” सादरीकरण आयोजित करावे, या उपक्रमांतर्गत प्रत्येक वेळी विद्यार्थी कशा पद्धतीने प्रगती करत आहेत याचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करावा. यासाठी ग्रामसेवकांचे सहकार्य घ्याचे.

आ) चावडी वाचन कार्यक्रमामध्ये, या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन व गणन घेण्यात यावे, उर्वरीत विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत याचा फक्त सांख्यिकी अहवाल सादर करावा. पुढील चावडी वाचनावेळी उर्वरीत विद्यार्थ्यांपकी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचेच वाचन व गणन घ्यावे. यासाठी आवश्यकतेप्रमाणे खडू-फळ्याची उपलब्धता या कार्यक्रमाच्या ठिकाणी करावी. अशा विद्यार्थ्यांना एखादे छोटे बक्षीस देण्याचा प्रयत्नही करावा.

इ) अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करु न शकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगण्यात येऊ नये, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशीच व्यवस्था करावी. विद्यार्थी नाउमेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. मुख्याध्यापकांनी उपरोक्त सर्व बाबींची खात्री व्यक्तिशः करावी.

ई) या कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील इच्छुक सुशिक्षित स्वयंसेवकांची मदत मिळविण्याचाही प्रयत्न करण्यात यावा.

१०) शिक्षकांसाठी सुलभीकरण

अ) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे स्तरावरुन याआधीही या विषयीचे दर्जेदार साहित्य व प्रशिक्षणे देण्यात आली आहेत. उदा. व्हिडीओ, कार्यपुस्तिका, इ. तसेच, उपरोक्त क्षमता प्राप्त झाल्या आहेत का याची पडताळणी करण्यासाठी अध्ययन अभ्यास सर्वेक्षण, विषय निहाय व अध्ययन निष्पत्ती निहाय साधने परिषदेच्या (maa.ac.in) संकेतस्थळावर “निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम” या विशेष टॅबवर उपलब्ध करण्यात येत आहेत.

आ) या प्रशिक्षणांच्या साखळीत “अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन” या प्रशिक्षणाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यात येत आहे. सर्व विद्यार्थी ठराविक गतीने शिकत नसल्यास शिक्षकांना वेळेच्या व्यवस्थापनात अडचणी निर्माण होतात. या प्रशिक्षणातून शिक्षकांना आपल्या वेळेचे व्यवस्थापन वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी खालील सहा पायऱ्या सुचविण्यात आल्या आहेत.

१. विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे,

२. विद्यार्थ्यांना शिकण्यास आव्हान देणे.

३. अध्ययन उपक्रम/कृती.

४. विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे,

५. विद्यार्थ्यांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग करणे.

६. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढविणे.

इ) विद्यार्थ्यांना शिकविण्याची सर्वाधिक जबाबदारी शिक्षकांची असल्याने वर्गामध्ये शिकविण्याची पद्धत व साहित्याच्या वापराबाबत तसेच, आपल्या वर्गातले विद्यार्थी कोणत्या अपेक्षित क्षमतांमध्ये मागे आहेत, विद्यार्थी मागे असण्यामागे कोणत्या त्रुटी / कारणे आहेत ते शोधणे आणि त्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांची गरज पाहून विद्यार्थीनिहाय योग्य त्या उपाययोजनेचे स्वातंत्र्य नेहमीप्रमाणे शिक्षकांना राहील, यासाठी स्वतःच्या क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकांनी कोणती पाऊले उचलली याची विद्यार्थिनिहाय नोंदही शिक्षकांनी योग्य त्या शब्दांमध्ये ठेवावी.

११) शिक्षक व शाळांना प्रशस्तीपत्रक

अ) विहित कालावधीत या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येईल. तसेच उत्कृष्ट कामकाज करणारे क्षेत्रीय अधिकारी यांनाही प्रमाणपत्र देण्यात येईल

आ) ज्या शाळा, शिक्षक दिलेल्या कालावधीत अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणार नाहीत अशा शिक्षकांकडे विशेष प्रशासकीय व अध्ययनात्मक लक्ष देण्यात येईल.

इ) कृती कार्यक्रम कालावधीत एखादा विद्यार्थी नव्याने शाळेत दाखल झाला तरी तो/ ती या कृती कार्यक्रमाचा भाग समजण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत शाळेत नवीन दाखल्यांना थांबविण्यात येऊ नये.

१२) शिक्षण परिषद

माहे मार्च, एप्रिल, मे व जून च्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करावी. जसे अध्ययन स्तर, कृती कार्यक्रम कार्यपद्धती, उद्दिष्टे साध्य होण्यासाठी करावयाचे प्रयत्न, उद्दिष्टे साध्य केलेल्या शिक्षकांचे अनुभव कथन, नियोजनपूर्वक केलेले कामकाज, नाविन्यपूर्ण बाबी, साहित्याचा वापर, शिक्षकांना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय, इत्यादी.

१३) शाळा भेटी-

या कालावधीत शाळाभेटी करताना पर्यवेक्षकीय यंत्रणेने याच मुद्द्यांकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करावे. सुरु असलेल्या कामाचा आढावा घ्यावा, मार्गदर्शन व सहाय्य करावे.

१४) जबाबदार घटक-

अ) विद्या समीक्षा केंद्र (VSK)- वर्ग व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी (Mapping) मुद्दा क्र. ६. (ऊ) अंतर्गत आदेशान्वये करणे, वर्ग घोषित करण्याची विद्यार्थीनिहाय ऑनलाईन सुविधा पुरविणे, पडताळणीबाबत माहिती भरल्यानंतर त्याबाबत प्रगतीदर्शक व स्थितीदर्शक विविध अहवाल तयार करुन प्रसिद्ध करणे.

आ) शिक्षक- मुद्दा क्र. ६. (ऊ) अंतर्गत आदेशान्वये शिक्षक या या कृती कार्यक्रमासाठीच्या अध्ययन क्षमता अपेक्षित स्तरापर्यंत साध्य करतील.

इ) मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समितीमध्ये या कार्यक्रमाबाबत चर्चा करणे, विद्यार्थी व शिक्षकांना सहाय्य होईल अशा उपाययोजनांची आखणी करणे, चावडी वाचन व गणन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे नियोजन करणे. मुख्याध्यापकांनी मुद्दा क्र. ६. (ऊ) अंतर्गत शिक्षकांचे आदेश दि.०६/०३/२०२५ पूर्वी निर्गमित करावेत.

ई) पर्यवेक्षण यंत्रणा पर्यवेक्षण यंत्रणेने वर्गमेटीच्या वेळी वर्गातील अपेक्षित वाचन व गणन क्षमता सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त आहेत व त्यामध्ये सातत्य आहे याची खातरजमा करावी. परिस्थितीनुरुप आवश्यक सहाय्य उपलब्ध करुन द्यावे. प्रत्येक पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी दर आठवड्यात विद्या समिक्षा केंद्र (VSK) वर या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त न झालेल्या किमान ५ शाळांना भेटी देऊन शिक्षकांना सहाय्य करावे व अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करावे.

उ) राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे, सर्व प्रादेशिक विद्या प्राधिकरणे, आणि सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्यासाठी आवश्यक सराव साहित्य, जादूई पिटारा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान (FLN) इ. साहित्याचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन करावे.

ऊ) आयुक्त (शिक्षण) व शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी या कृती कार्यक्रमाची काटेकोर व विहित मुदतीत यशस्वी अंमलबजावणी होईल यासाठी सर्व अधिनस्त कार्यालये व अधिकारी यांचे प्रभावी संनियंत्रण करावे.

१६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३०५१५४१०३७४२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

Join Now