“मराठी असे आमची मायबोली” मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुंदर भाषण marathi bhasha gaurav din
मराठी भाषा अतिशय लवचिक आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ आहेत आणि एकाच अर्थाचे अनेक शब्द आहेत. यामुळेच मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मराठी भाषा सर्व महाराष्ट्राची जरी एक असली तरी ती दर बाराकोसावर बदलते. लेखी भाषा तीच असली तरी बोलीभाषेत फरक होतो. तिचे हेल वेगळे होतात. मराठीत अनेक पोटभाषा आहेत. जळगाव, धुळे आणि नाशिक येथे अहिराणी, पूर्व खानादेशात खानदेशी, विदर्भात वऱ्हाडी किंवा विदर्भी, कोकणात कोकणी तर गोव्यात कोंकणी भाषा बोलली जाते. पराभी, कोळी, किरिस्ताव, कुणबी, आग्री, ठाकरी, बाणकोटी, मावळी, मालवणी, अशा अनेक भाषा कोकणी भाषेत येतात. नायगाव, वसई, डहाणू भागात वडवली बोलली जाते. नालासोपारा आणि विरार भागांत सामवेदी बोलली जाते. दक्षिण भारतात तंजावर मराठी, नामदेव मराठी आणि भावसार मराठी बोलली जाते. महाराष्ट्र गुजरात सीमेवर डांगी भाषा बोलली जाते. अशी ही मराठी भाषा नुसती भारतातच नव्हे तर मौरिशस आणि इस्रायलमध्येही बोलली जाते.
आता गंमत अशी आहे की ही भाषा दर पंचवीस किलोमीटरवरवेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषाखणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, “आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!” साताऱ्याला भाषा थोडी नरम होते. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या तंबाखूची गुंगी त्यात डोकावते. तरी पण “लई” “चिक्कार” ‘आयला’ वगैरे म्हणजे खास सातारी ढंग ! कोकणात हीच मराठी अगदी मऊ होते.
मराठी भाषेचा उगम संस्कृतपासून तर तिचे व्याकरण आणि वाक्य रचना प्राकृत आणि पालीपासून तयार झाले आहे.
काळ बदलला तसे मराठी भाषेत अनेक बदल झाले आहेत. मराठी भाषेत अरबी, फारशी,
कानडी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांतले शब्द आले आहेत.
आज इंग्रजीला फार महत्त्व आहे. यात कोणाला दोष द्यायचा? कारण महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षण सर्व इंग्रजीतून होते. पदव्या मिळवून तरुण मंडळी परदेशात उच्च शिक्षणासाठी जातात. तिथे इंग्रजी भाषाच बोलावी व लिहावी लागते. असो.. पण म्हणून आपण आपल्या मातृभाषेला विसरून जायचे का? परभाषा जरी अवगत झाली तरी आपल्या मराठीला विसरु नका. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता-वाचता आली पाहिजे. आपल्या मराठीतसुद्धा खूप विषयांवर लेखन झाले आहे. शास्त्र विज्ञान, ललित साहित्य खूप आहे. त्याचा उपयोग करू या, आपल्या ज्ञानात वाढ करू या! म्हणून मराठीत फक्त बोलू नका तर लिहूनही ही भाषा आणखी समृद्ध करुया.