मोठी बातमी ! सन २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ एप्रिलपासून भरविले जाणार school opening timetable
पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरणार १ एप्रिलपासून; अध्यापनाचे दिवस २२० होण्यासाठी पहिली ते नववीची परीक्षा ‘या’ वेळापत्रकानुसारच
सोलापूर : शैक्षणिक वर्षात शाळांना एकूण ७६ दिवस सार्वजनिक सुट्या असतात. याशिवाय दर आठवड्यातील रविवारी (एकूण ५२ रविवार) देखील शाळांना सुटी असते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अंतिम सत्र परीक्षा संपल्यावर विद्यार्थी शाळेला येतच नाहीत, अशीही वस्तुस्थिती आहे.
त्यामुळे वर्षातील ३६५ दिवसांपैकी २२० दिवस देखील विद्यार्थ्यांचे अध्यापन होत नाही. या पार्श्वभूमीवर आता सुरवातीला २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ एप्रिलपासून भरविले जाणार आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा अंगणवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे. ‘बालभारती’कडून सध्या युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई सुरू आहे. ‘सीबीएसई’च्या शाळा आता १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरवात त्याचवेळी होणार आहे.
तत्पूर्वी, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग १ एप्रिलपासून भरविण्यात येणार असून, त्यादृष्टीने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने तयारी सुरू केली आहे; जेणेकरून विद्यार्थ्यांना वर्षातील २२० दिवस अध्यापन करणे शक्य होणार आहे. शाळा एप्रिलपासून सुरू झाली, तरी १ मेनंतर निश्चित काळातील उन्हाळा सुटी विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. १० ते १५ जूनपासून पुन्हा शाळा सुरू होतील, असा बदल असणार आहे.
इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता एकाचवेळी
इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा तथा संकलित मूल्यमापन, पॅट चाचण्यांचे आयोजन ८ ते २५ एप्रिल या काळात घ्यायची आहे. नियोजनानुसार सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा वेळेत घेण्याची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल. १ एप्रिलपासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्याचे नियोजन सुरू असून, लवकरच त्यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल.
– राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
पहिली ते नववीची परीक्षा वेळापत्रकानुसारच
राज्यातील शाळांमध्ये पहिली ते नववीच्या वर्गाची परीक्षा एप्रिलमध्ये शाळास्तरावर होतात. एप्रिलच्या सुरवातीस वार्षिक परीक्षा पूर्ण झाल्यावर शाळा सुरू असूनही विद्यार्थी येत नाहीत. त्यामुळे परीक्षा शैक्षणिक वर्षअखेर घेण्याऐवजी लवकर घेतल्याने विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी कालावधी कमी मिळतो. प्रत्येक शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याने देखील अडचणी येतात. त्यामुळे आता पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एकाचवेळी घेण्याचा (८ ते २५ एप्रिल या काळात) निर्णय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने घेतला आहे. अपवादात्मक परिस्थितीत वेळापत्रकात बदल करावयाचे असल्यास शिक्षणाधिकाऱ्यांनी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेची परवानगी घ्यावी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्या आदेशात नमूद आहे.