क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सुंदर निबंध krantijoti savitribai fule marathi nibandh
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींना प्रेरणा दिली आहे. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत. महिला सशक्तीकरणाकरिता त्यांनी आपल संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे.
सावित्रीबाई फुले त्यांची जयंती ‘बालिका दिन’ म्हणूनही साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले यांची 194 वी जयंती साजरी केली जाणार आहे. देशातील तसेच महाराष्ट्रातील शाळांमध्ये तसेच इतर ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात येते. यावेळी शाळांमध्ये त्यांच्यावर आधारित भाषणे सादर केली जातात. त्यानिमित्त आम्ही सावित्रीबाई फुले यांच्यावरील मराठीत भाषण किंवा निबंध कसे लिहायचे ते सांगणार आहोत.
आदरणीय गुरुजन वर्ग आणि मझ्या बाल मित्र व मैत्रिणिंनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त येथे उपस्थित आहोत. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत.
बालविवाहावर बंदी, विधवांवरील अत्याचाराला लगाम लावणे आणि महिलांच्या कल्याणाचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तुत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला. सावित्रीबाई फुले यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते तर आईचे नाव लक्ष्मी होते.
सावित्रीबाई फुले ह्या त्यांच्या पालकांच्या ज्येष्ठ कन्या होत्या. गावचे पाटील असणाऱ्या नेवासे यांचे घराणे हे पेशवे काळातील इनामदार घराणे होते. घरची परिस्थिती चांगली असल्याकारणाने साहजिकच सावित्रीबाईंचे बालपण अतिशय मजेत आणि सुंदर गेले.
वयाच्या 9 व्या वर्षी सातारा जिल्ह्यातील कटगुन या गावातील 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला.
ज्योतिराव फुले यांचे शिक्षणाकडे विशेष आकर्षक होते. ज्योतिराव इंग्रजीचे शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला होता. ज्योतिराव फुलेंनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सावित्रीबाई शिक्षित झाल्यानंतर त्यांनी मुलींना शिक्षण देण्याचे ठरवले.
1848 साली स्त्रिया व अस्पृश्य यांना शिक्षण देणे हा गुन्हा होता. हे कार्य करत असताना वेळप्रसंगी समाजाची निंदा व अवहेलना सुद्धा त्यांनी सहन केली. समाजाची होणारी टीका सहन करत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी मुलींची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात काढली. त्यानंतर हळूहळू 18 शाळा उघडल्या.
भिडे वाड्यात सुरू केलेली शाळा ही महाराष्ट्रातील पहिलीच मुलीची शाळा होती. त्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले या स्वतः मुख्याध्यापक म्हणून काम पाहू लागल्या. सुरुवातीला त्यांच्या शाळेमध्ये पाच ते सहा विद्यार्थिनी होत्या. पण 1848 साल संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. मुली शाळेत येत असल्यातरी सावित्रीबाई फुले यांना समाजाच्या टीकेला समोरे जावे लागत होते.
महात्मा फुले यांना आपल्या समाजात विधवा स्त्रियांना भोगावं लागणारा त्रास पाहून ज्योतिराव फुले यांनी विधवा स्त्रियांसाठी काही तरी मदत करण्याचं ठरवलं. दुर्दैवी स्त्रियांना दिलासा व आधार देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालविले. 1897 मध्ये पुण्यात एक भयानक प्लेग ची साथ पसरली. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा उपाय योजला तेव्हा सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. प्लेगच्या रूग्णांची सेवा करत असताना त्या स्वतः देखील प्लेगच्या बळी पडल्या. 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले.