दहावी-बारावीचा निकाल 15 मेपर्यंत लागणारः शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य ssc hsc result
Pune news: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा 15 मेपर्यंतच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात शिक्षण विभागातील विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधत पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
भुसे म्हणाले, बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. राज्यात कॉपीमुक्त परीक्षा होण्यावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. 30 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा दहावी-बारावीची परीक्षा 15 ते 20 दिवस अगोदर सुरू होईल, असे राज्य मंडळाने शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू होण्यापूर्वीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे यंदा परीक्षा लवकर सुरू होणार आहेत.
यापूर्वी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या दुसऱ्या- तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येत होता. परंतु, गेल्या काही वर्षांत बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जात आहे.
सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी विषय बंधनकारक
राज्यात एक लाखाहून अधिक शाळा, दोन कोटी दहा लाख विद्यार्थी आणि साडेसात लाख शिक्षक आहेत. राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत म्हटले जावे, याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. सर्व माध्यमांच्या सर्व शाळांमध्ये मराठी विषय बंधनकारक करण्यात येईल. राज्यातील शाळांच्या गुणवत्तापूर्ण आणि भौतिक विकासाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येत आहे, असेही भुसे यांनी स्पष्ट केले.