दुसऱ्या टप्प्यात राज्यात १५ हजारांवर शिक्षकांची भरती : शालेय शिक्षण विभागाने मागितली परवानगी pavitra portal second round
प्रतिनिधी जळगाव :- शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागातर्फे खासगी अनुदानित व जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांपैकी ८० टक्के शिक्षकांची दुसऱ्या टप्प्यातील पदभरती ३० जूनपूर्वी केली जाणार आहे.
त्यादृष्टीने शालेय शिक्षण विभागाने १४ ते १५ हजार शिक्षकांच्या भरतीसाठी परवानगी मागितली असून, तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
जिल्ह्यानुसार रिक्त पदांची यादी येथे पहा
तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ३० हजार शिक्षकांच्या भरतीची घोषणा केली होती, पण त्यातील २३ हजार शिक्षकांचीच भरती झाली. झेडपी शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी आवश्यक असून, आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग या शाळांत सुरू करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या. त्याची सुनावणी शिक्षण आयुक्तांकडे सुरू होत्या आणि आता त्यातील बहुतेक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे त्या जिल्हा परिषदांमधील एकूण रिक्त पदांच्या ८० टक्के शिक्षकांची भरती आता दुसऱ्या टप्यात केली जाणार आहे. सध्या पवित्र पोर्टलच्या दुसऱ्या टप्याचे काम सुरू असून, त्यासाठीही निविदा काढून नव्याने मान्यता किंवा पूर्वीच्या मक्तेदाराला मुदतवाढ आवश्यक आहे. या संदर्भातील निर्णयाकडे लक्ष लागलेले आहे.
खासगीतील भरतीवेळी ‘शिक्षण’चा प्रतिनिधी
खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवरूनच एका पदासाठी दहा उमेदवार दिले जाणार आहेत. त्यांच्या मुलाखती घेऊन त्यातील एकाची निवड करण्याचा अधिकार संबंधित संस्थेला आहे. पण या मुलाखतीवेळी शिक्षण विभागाचा प्रतिनिधी उपस्थित ठेवण्यात येणार असल्याने वशिलेबाजीला लगाम बसेल.
कंत्राटी भरतीवर अद्याप प्रश्नचिन्ह आहे कायम
राज्यातील जिल्हा परिषदांच्या १५ हजारांहून अधिक शाळांची पटसंख्या १ ते २० पर्यंत असून, त्यातील पाच हजार शाळांची पटसंख्या १० पेक्षाही कमी आहे. त्या शाळांत डीएड, बीएडधारक तरुण-तरुणांना कंत्राटी तत्त्वावर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. पण प्रक्रिया अद्याप झाली नसल्याचे चित्र दिसते आहे.
जिल्ह्याला होणार फायदा:
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांत सुमारे दहा टक्के जागा रिक्त आहेत. या जागांवर भरतीसाठी शिक्षक संघटना प्रयत्नशील आहेत. ही भरती झाल्यास जिल्ह्याला फायदा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.